चंद्रपुर

संचारबंदी भंग करणार्‍या २१ जणांवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : जगभरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भारतातही ही संख्या वाढत आहे. वैद्यकीय सूत्रानुसार यावर केवळ अलिप्त राहणे,घरात राहणे हाच इलाज असून त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी संचार बंदीच्या संपूर्ण काळात घरीच राहावे, प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज केले. दरम्यान आज दि.२५ मार्चला चंद्रपुरात संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या २१ जणांवर कारवाई केली आहे .
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी जारी केली आहे. हा निर्णय देश हितार्थ आहे. या काळामध्ये नागरिकांना मूलभूत प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
आज सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, पाणी पुरवठा तसेच आवश्यक आरोग्य सुविधा या परिस्थितीत जनतेला कशा पद्धतीने उपलब्ध करावी, यासंदर्भात चर्चा केली. चंद्रपूर महानगरपालिकेने निराश्रीत, गरीब व ज्यांच्याकडे रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा सर्व नागरिकांसाठी महानगरपालिका हद्दीत कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र हे भोजन त्यांना पार्सल स्वरूपात अर्थात घरी घेऊन जाण्यासाठी मिळणार आहे. यासाठी महानगरपालिकेने ०७१७२-२५४०१४ टेलिफोन सेवा उपलब्ध केली आहे.शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थित राहावा, वीज पुरवठा नियमित स्वरूपात राहावा, यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

नागरिकांना घरी थांबण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहे. कोरोना हा आजार केवळ अलगीकरण प्रक्रियेतूनच नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता घरीच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील १४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यामध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तू दुपारी ११ ते ३ या वेळेतच खरेदी करता येणार आहे. मात्र यासाठी झुंबड उडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मुबलक साठा उपलब्ध असून गरजेनुसार तो आणखी प्रमाणात उपलब्ध केल्या जाईल. तसेच भाजीपाला ,दूध आदी जीवनावश्यक वस्तू नियमित स्वरूपात मिळाव्या यासाठी प्रशासन कार्यरत असून कोणत्याही वस्तूचा तुटवडा पडणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या दुकानांमधून केवळ आवश्यकतेनुसार खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.