चंद्रपुर

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्‍चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *