
नवी दिल्ली: भारताचे माजी राष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे मृ्त्युसमयी ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना १० ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली.
प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही. प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश येऊ शकले नाही. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
