गडचिरोली (प्रति) जिल्ह्यात बाहेरून आलेल्या १४२८७ नागरिकांना संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यांनी गृह विलगीकरणात रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ दिवस त्यांनी घरातच थांबून होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५५२ बाहेरून आलेल्या नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे उशिरा दिसत असून, लक्षणे दिसण्यापूर्वीही यातून संसर्गाची लागण होऊ शकते, या पाश्र्वभूमीवर जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्यासर्वच नागरिकांना घरात राहणे बंधनकारक केले आहे. त्यांच्या हातावर आरोग्य विभागाने शिक्के मारले आहेत. तसेच या लोकांवर कोरोना संसर्ग लक्षणांबाबत निरीक्षण केले जात आहे.


