चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अजयपूर नजिक झालेल्‍या अपघातातील मृतांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाखाच्या आर्थीक मदतीचा आदेश निर्गमित

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्याचे फलित

चंद्रपूर-मुल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्‍या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेला ट्रक यांच्‍यात झालेल्‍या भिषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या ९ जणांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री निधीतुन मृतकांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्‍याची घोषणा केली.

अजयपूर गावाजवळ झालेल्‍या भिषण अपघातादरम्‍यान मोठी आग लावून ९ मजूरांना भाजून मृत्‍यु झाला होता. या अपघातानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्‍यमंत्री निधीतुन मृतकांच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्‍याची मागणी केली होती. मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्‍याशी याबाबत त्‍यांनी चर्चा देखील केली होती. जिल्‍हाधिकारी श्री अजय गुल्‍हाने यांची भेट घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्‍ताव शासनाला पाठविण्‍याची विनंती केली.जिल्हाधिका-यांनी आ. मुनगंटीवार यांच्‍या  पत्राच्या संदर्भाने शासनाला प्रस्ताव सादर केला.मृतकांच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याबाबतचा आदेश दि. 25 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निर्गमित करण्यात आला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे मृतकांच्या कुटुंबियाना मदतिचा हात मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *