
चंद्रपूर (का.प्र.)सध्या संपूर्ण जगात कोरोना (कोविड-१९) विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना (कोविड – १९) विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्ह्यात जमाबंदी व संचारबंदी लागू केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी राखी संजय कंचर्लावार यांच्याद्वारे वैयक्तिक १ लाख रुपयांचा धनादेश ०७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड – १९ अंतर्गत सुपूर्त करण्यात आला. कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पाश्र्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिके मार्फत शहरात जागोजागी स्वच्छतेचे काम सुरु आहे, फवारणी, फॉगिंग, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन बाहेर गावातून आलेल्या नागरिकांची माहीती गोळा करण्यात येत आहे व असे नागरीक आढळल्यास त्यांना क्वारंटाईन करून समाजाच्या इतर घटकांत पसरु नये याची काळजी घेतली जात आहे.
ज्यांचे हातावर पोट आहे असे रोजंदारीवर काम करणारे मजूर, शिकणारे विद्यार्थी, एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणाèया बेघर नागरिक अश्या नागरिकांच्या मदतीकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कम्युनिटी किचन तयार करून गरजवंतांची दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. अश्या कठीण परिस्थितीत सर्वांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करून सामाजिक दुरी ठेवावी, घरी राहावे व सुरक्षित राहावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.



