
राजुरा (ता.प्र.)गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त मराठी नववर्ष म्हणून हा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूत येणारा गुढीपाडवा निसरगीत नवचैतन्याची ऊर्जा निर्माण करतो. पानझडीनंतर बहरलेली हिरवी पालवी जणुकाही नव्या उमेदीने जगायला शिकविते. कोरोनाच्या दहशतीत आपला देश लॉकडाऊनफ केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष साजरा करताना गृहिणीनी नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर कोरोना हद्दपार करण्याचा संकल्प सोडला आहे. कोरोणा मुक्तीच्या संकल्पाने वर्षाचे स्वागत करू या, यावर्षीचा गुढीपाडवा घरात राहुन साजरा करू या असा संदेश देत राजुरा येथे मनीषा आशुतोष चटप या दाम्पत्याने नवसंकल्पनाची गुढी उभारली. कोरोना विषाणूविरुद्ध सर्व नागरिकांनी घरातच राहुन लढण्याचा संदेश दिला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश संकटात सापडलेला आहे .
महाराष्ट्रातही या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अलिप्त राहाणे आज एकच पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी व कुटुंबीयाने घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचललेली आहेत. संचारबंदी, आंतरजिल्हा बंदी लागू असल्यामुळे कुटुंबीयांनी गुढीपाडवा मराठी नववर्षाचा सण घरीच साजरा करणे पसंत केले. कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वानी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे. स्वतःची व आपल्या कूटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन नववर्षानिमित्त तनिष्का मनीषा चटप यांनी केले आहे.



