
बल्लारपूर(प्रति) :-बल्लारपूर शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जातो. त्याकरिता शहराजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातून पाणी उचलल्या जाते. यासाठी पात्रात तीन विहिरी आहेत.
वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते.यावर उपाय म्हणून, मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयारकेला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त्यामुळे, सध्यातरी येथे पाण्याची टंचाई नाही. शहराला आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे.मात्र, यंदा उन्हाळा चांगलाच तापत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी अधिक खालावत जावून टंचाई निर्माण होउ शकते. तसे झाल्यास यावर मजिप्राने इरई डॅमकडून पाणी घेण्याचा पर्याय ठेवला आहे. पाण्याबाबत अशी आणीबाणी निर्माण झाल्यानंतर इरई डॅमचे पाणी वर्धा नदीत सोडून ते विहिरीने उचलायचे असे ठरले आहे व तशी तयारी करून ठेवली असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील यांनी’लोकमत’ला दिली आहे. दोन वर्षांपूर्वी, पाणी टंचाई दूर करण्याकरिता याप्रकारे इरई डॅममधून पाणी उचलावे लागले होते हे येथे उल्लेखनीय!(प्रा. योगेश खेडेकर, बल्लारपूर)



