लॉकडाउन लागू होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या गुरुवारी १२९७ वर पोहचली आहे. एका दिवसात महाराष्ट्रामध्ये १६२ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी- चिंचवड या शहरांसह राज्यातीलकोरोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे. मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज एकाच दिवशी मुंबईत करोनाचे ७९ नवीन रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत शहरात करोनामुळे ९ जण दगावले आहेत. विविध रुग्णालयांत दाखल असलेले ६ करोनाबाधीत आज पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबई महापालिकेने करोना साथीचा आजचा तपशील जारी केला आहे. त्यानुसार मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ७७५ वर पोहचली आहे (५४ मृत्यू मिळून). आतापर्यंत शहरात एकूण ६५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर ५४ जण करोनाने दगावले आहेत.



