आंबेडकरी लोकशाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लेखणीतून घराघरात पोहोचविले व समाज प्रबोधनाची क्रांतीज्योत तेवत ठेवली.त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वामनदादा कर्डक साहित्य प्रबोधनी,नागपूर द्वारा काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रा प्रशांत खैरे यांच्या वांझोटा विकास या कवितेला विजेता सन्मान देऊन त्यांना राज्यस्तरीय वामनदादा कर्डक काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. खैरे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे कनिष्ठ व्याख्याता पदावर कार्यरत असून नुकताच त्यांचा “मला श्वास घेता येत नाही “हा पहिलाच कवितासंग्रह प्रकाशित झाला .या संग्रहातील परिवर्तनवादी, सामाजिक भान असलेल्या विद्रोही व वास्तववादी कविता महाराष्ट्रातील साहित्यिक व वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. या कवितासंग्रहास गेल्या काही दिवसात चार राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



