चंद्रपूर(का.प्र.) – पावसाळ्यामुळे होणारी गैरसोय पाह्ता भाजी मार्केट पुन्हा गंजवार्ड येथे सुरु करता येईल मात्र मात्र विक्रेते व ग्राहकांना कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी सांगितले. कोहिनूर तलाव येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरु करण्यात आलेले भाजी मार्केट आता पुन्हा आपल्या जुन्या जागी गंजवार्ड येथे स्थलांतरीत करण्यासंबंधी गाळेधारक व विक्रेत्यांची आढावा बैठक मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली १७ जून बुधवार रोजी मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या आधी शहरात लागू असलेल्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू जसे भाजीपाला, फळे यांच्या खरेदीकरीता नागरीकांना सूट होती, मात्र या वस्तू घेतांना नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळायची, या गर्दीमुळे विक्री करणारे विक्रेते व खरेदीसाठी येणारे ग्राहक यांच्याद्वारे भौतिक दुरतेचे पालन केले जायचे नाही, परिणामी विषाणू संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यावर उपाययोजना म्हणून आयुक्त राजेश मोहिते यांनी गंजवार्ड येथील भाजी मार्केट कोहिनूर मैदानात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले होते.



