चंद्रपुर

पालकमंत्री वडेट्टीवारांचा गरजवंताला मदतीचा हात

चंद्रपूर (का.प्र.) कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंतांची, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप येत्या ५ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्याहाताला काम नाही, लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नये, त्यांना पोटभर अन्न उपलब्ध व्हावे म्हणून तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा गरजू लोकांना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून मोफत अन्न धान्य व जीवणावश्यक वस्तूचे वाटप संबधित तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा मतदार क्षेत्र असलेल्या ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही या तालुक्यासाठी १५ हजार बॅग व जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यासाठी १५ हजार बॅग अशाप्रकारे ३० हजार बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य वाटप करण्यासाठी पालकमंत्र्यांनी संबधित तहसिल कार्यालयाचा कर्मचारी, ग्रामसेवक व काँग्रेसचे दोन प्रमुख कार्यकत्र्यांची तसेच चंद्रपूर शहरासाठी तहसिल कार्यालयाचा कर्मचारी व महाविकास आघाडी प्रमुख तीन कार्यकत्र्यांची टीम तयार करण्यात आलेली आहे.

ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली यासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयात जीवनावश्यक धान्याचे किट उपलब्ध करण्याचे काम सुरु झाले असून येत्या ५ एप्रिल पासून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. धान्यव जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना शासनामार्फत लागू असलेले कलम १४४ चे पालन व्हावे म्हणून गरजूवंतांची यादी तयार करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी व देशाच्या चांगल्या आरोग्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज होती. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले.

संपूर्ण लॉकडाउन म्हटल्यावर सर्वच थांबले. वाहतूक थाबली, कामधंदे थांबले, मग ज्याचे हातावर आणून पोट भरते त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार या विचारातून अशापरिस्थिती त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार मार्फतीने ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व गरीब व गरजूना मोफत १० किलो तांदूळ, २ किलो तूर डाळ, १ किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, १ किलो मीठ, १ डेटॉल साबण या जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात येणार आहे. शासनाकडून जे साहित्य मिळणार आहे ते साहित्य मिळेलच. त्या व्यतिरिक्त पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून हे साहीत्य मोफत मिळणार आहेत. समाजाने समाजाच्या कामात आले पाहिजे या उक्तीनुसार पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार हे नेहमीच कार्य करीत असून गरजू, गरीब, शेतकरी, शेतमजूर या लोकांना मदत करण्यासाठी अग्रेसर असतात असा त्यांचा परिचय चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.