
जिवती :- येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भभवू नये म्हणून सर्व नालेसफाईची कामे संबधीत यंत्रणांनी ३१ मे पर्यत करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील शांतीनगर या भागाला लागून असलेल्या मुख्य नाल्याची सफाई संबधीत प्रशासनाने करावी अशी मागणी शांतीनगर वासीय करीत आहेत. पावसाळा सुरू होत असून शहरातील मान्सूनपूर्व कामे बाकी आहेत. शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या केरकचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, व रस्त्यावरही काही ठिकाणी पाण्याची मोठं मोठी डबकी साचलेली दिसत आहेत. शहराच्या रस्त्यालगतच्या नाल्यात कचरा साचल्याने पाणी वाहून न जाता ते रस्त्यावर व नागरिकांच्या घरात येत येणार आहे, यामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी याच नाल्यालगत असलेल्या नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले होते. नाल्याची साफसफाई, मान्सूनपूर्व कामे नगरपंचायत प्रशासनाने सुरू करावीत. तसेच ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे त्या ठिकाणी मुरूम टाकाने गरजेचे आहे. तरी नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन कामे सुरू करण्याची मागणी जिवती शहर वासीय करीत आहेत.




