चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महर्षी वाल्मिक ऋषींच्या रचित “रामायणामुळे प्रभू राम चरित्राची जगाला ओळख – माजी मंत्री वडेट्टीवार

पेटगाव येथे महर्षी वाल्मिक ऋषी मूर्ती प्रतिष्ठापना उत्सव
समाजातील साधू संतांचे विचार हे समाज घडविण्यासाठी नेहमीच प्रेरक ठरले आहे. त्यांनी दाखवलेली दिशा ही समाजाला विकासाची वाट दाखविणारी असून यातून समाजाचे कल्याणच झाले आहे. अशा थोर संत महर्षी वाल्मिकी ऋषींनी जे महान ग्रंथ रामायण रचिले त्या ग्रंथातूनच जगाला प्रभू रामचंद्राच्या चरित्राची संपूर्ण ओळख झाली. असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते पेटगाव येथे महर्षी वाल्मीक ऋषी जयंती निमित्ताने आयोजित मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. महर्षी वाल्मिकी भोई समाज पेटगाव च्या वतीने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याची माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही अध्यक्ष रमाकांत लोधे, दत्तात्रय कवठे, दादाजी चौके , सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक माजी प.सं. सदस्य राहुल पोरेड्डीवार, सरपंच संघटना अध्यक्ष राहुल बोडणे,वीरेंद्र जयस्वाल, सचिन नाडमरवार, नगरसेवक पंकज नन्नेवार, अनिल उट्टलवार, सुशांत बोडणे,अरुण साहारे, प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर महर्षी वाल्मिकी भोई समाज पेडगाव यांच्या वतीने नव्याने मूर्ती स्थापना करण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मूर्तीची विधिवत पूजा करून अनावरण करण्यात आले.  यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आ. वडेट्टीवार म्हणाले की, भोई समाज हा फार मेहनती समाज असून अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवाहात आला नाही. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता महाविकास आघाडी सरकार काळात आपण मंत्री असताना भोई समाज बांधवांना हक्काची घरे देण्या हेतू प्रयत्न चालवून सिंदेवाही तालुक्यात  1174 घरकुले मंजूर केली. या समाजातील तरुणांनी उच्चशिक्षित व्हावे याकरिता ही महाज्योती अंतर्गत योजना कार्यान्वित केल्या होत्या. कोळी समाज बांधवांचा मुख्य व्यवसाय मासे विक्री असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात येणारे कंत्राट मोठ्या कंत्राट दाराच्या घशात जात असून केवळ मजुरी देऊन कोळी बांधवांची उपेक्षा केली जात आहे. यामुळे वाढती महागाई व समाजात असलेली निरक्षरता समाजाच्या उन्नतीत अडसर ठरत आहे. कोळी समाजा जातील तरुणांनी उच्चशिक्षित होऊन समाजाला दिशा देण्याची काम करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. तर कोळी समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम भोयर तर आभार रामचंद्र भोयर यांनी मानले. याप्रसंगी शेकडो भोई समाज बांधव तथा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *