चंद्रपूर येथिल नारायणा विद्यालयम् ने तुघलकी निर्णय घेत शैक्षणिक शुल्क भरले नाही ह्या कारणाने शाळेतील 13 विद्यार्थ्यांना पालकांचे मत विचारात न घेता अथवा पालकांना कुठलीही सुचना न देता शाळेतून बेदखल केले असुन पालकांना आपले म्हणणे मांडता येऊ नये ह्या उद्देशाने त्या विद्यार्थ्यांच्या घरी थेट रजिस्टर्ड पोस्टाने टी सी पाठविण्याचा सुलतानी प्रकार केला असल्याची भावना पीडित पालकांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शाळेच्या शुल्कात दरवर्षी करण्यात येणारी वाढ, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू असुनही फी मधे होणारी भरमसाठ वाढ, सर्व शाळांनी फी कमी करूनही ह्या शाळेने फी संदर्भात घेतलेली ताठर भुमिका इत्यादी अनेक आक्षेप पालकांनी घेतले असुन वेळोवेळी आपला विरोध शाळेला लिखित स्वरुपात कळविला आहे त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद चंद्रपूर ह्यांचे कडे प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे कैफियत मांडली असुन अजूनपर्यंत सदर शाळेच्या व्यवस्थापनावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने शाळा व्यवस्थापन मनमानी करत असुन ह्या सर्व प्रकरणातशाळा व्यवस्थापनाने ह्यावर्षी सुद्धा पालकांकडून शिक्षक पालक संघाच्या स्थापनेबद्दल विचारणा केली होती मात्र पालकांनी रुची दाखविल्यानंतरही काही विशिष्ट धनदांडग्या पालकांच्या सहमतीने बेकायदेशीररित्या शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली असुन त्यावेळी इतर पालकांना शाळेत येण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. एव्हढेच नाही तर त्यावेळी पालकांना धमकावण्यात आले व जबरदस्तीने शाळेबाहेर काढुन शाळेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. तरीही पालक ताटकळत उभे असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले असा आरोप पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात केला आहे. शिक्षणाधिकारी उल्हास नरड ह्यांची भुमिका संशयास्पद असल्याचे चित्र आहे.ह्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढुन टाकण्यात आले त्यांचे पालक गुन्हेगार किंवा नक्षलवादी असल्याच्या अविर्भावात त्या पालकांनी शाळेत येऊ नये अशी सुचना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली असुन जर ते पालक शाळेत आले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल अशी धमकी शाळा व्यवस्थापनाने दिली आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे व पदके शाळेत असुन ते आणण्यास गेल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करणार का असा सवाल पीडित पालकांनी केला आहे.
ह्या संदर्भात शिक्षणाधिकारी उल्हास नरड ह्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी ह्यायासंदर्भात शाळेची भुमिका बेकायदेशीर असल्याचे मान्य केले मात्र मागील वर्षी शिक्षण उपसंचालक ह्यांच्या कार्यालयात सदर शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सांगितले मात्र एव्हढा मोठा प्रकार घडूनही शिक्षणाधिकारी कार्यालयाकडुन शाळेवर कोणती कारवाई होणार ह्यावर मौन बाळगले असुन त्यांची भुमिका संशयास्पद ठरली आहे.
पालकांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे शिक्षणाधिकारी माध्य. ह्यांनी उपशिक्षणाधिकारी पुनम मस्के ह्यांनी पालकांना शाळेने पाठविलेल्या टी सी च्या प्रती मागितल्या असुन आपण स्वतः शाळेत जाऊन व्यवस्थापनासोबत चर्चा करणार असल्याचे मान्य केल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले असुन शाळेवर कठोर कारवाई करून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू करण्याची मागणी केली आहे व असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही पालकांनी सांगितले आहे.





