घरकुल लाभार्थ्याचा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करणार
कोठारी येथील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ववत सुरू करा.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो घर जमीनदोस्त झाली. त्यामुळे या अतिवृष्टीतील पिडीतांसाठी शासनाद्वारे घरे घोषित करण्यात आली. यामध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र ऐन वेळी योजनेतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आले. त्यामुळे ५५८ लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळालेली नाही. हा विषय अतिशय संवेदनशील असून या अन्यायाच्या विरोधात विधीमंडळात आपण प्रश्न उपस्थित करणार असल्याचे विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच कोठारी येथील पाणी पुरवठा योजनेतील ४९६ नळ कनेक्शन तात्काळ सुरू करण्यात यावे. त्याचप्रमाणे ड यादीतील घरकुलांना शबरी व रमाई योजनेतून घरकुल वितरित करावे, असे निर्देश त्यांनी दिले. दिनांक १७ जून २०२१ ला घेण्यात आलेल्या झूम बैठकीमध्ये आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.२०१९ मध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. यामध्ये हजारो घरे जमीनदोस्त झाली. त्यामुळे शासनाद्वारे या अतिवृष्टीतील पीडितांना घरे वाटप करण्यात आली. मात्र ऐन वेळी यातून फक्त चंद्रपूर जिल्ह्यालाच वगळण्यात आले. अशी सापत्न वागणूक फक्त चंद्रपूर जिल्ह्यालाच का ? असा प्रश्न आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार पोंभूर्णा पंचायत समिती सभापती कु. अल्का आत्राम उपाध्यक्ष ज्योती बुरांडे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.कोठारी पाणी पुरवठा योजना खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यासाठी विधानसभेच्या माध्यमातून मोठा संघर्ष केला आहे. मुळात ही योजनाच संघर्ष करून आणलेली आहे. तीच योजना आज बंद आहे. हे फार मोठे दुर्दव आहे. मागेल त्याला पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे हे आपले धोरण असले पाहिजे . येत्या ७ दिवसाच्या आत कोठारी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.तसेच ड यादीतील घरकुल योजना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश यावेळी दिले.३ मार्च २०२० पासून घरकुल योजनेची साईट बंद आहे, त्यामुळे ड यादीतील रिक्त घरकुलाना मंजुरी मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना शबरी व रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही आहे. महाविकास आघाडी शासनाने घरकुल योजनेची बंद असलेली साईट तात्काळ सुरू करून लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करावे. तसेच ड यादीमध्ये आणखी नव्या लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश करावा असे आ. मुनगंटीवार म्हणाले.


