
चंद्रपूर:राज्यात कोरोनामुळं घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, धुळे, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु
रेस्टॉरंट, मॉल्स , वॉकिंग ट्रेक सुरू होतील, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
शुटींगला परवानगी
थिएटर सुरू होतील
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे
ई कॉमर्स सुरू राहिल, सलून सुरू राहणार
पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही
100 टक्के क्षमतेने प्रवास मुभा राहिल
राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील
मुंबई लोकलचं काय?
दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.



