
भारतासह महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोना व्हायरसचा धोका आता चिंतेमध्ये वाढ करत आहे. आज महाराष्ट्रात 5 नव्या रूग्णांची COVID 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता हा आकडा 112 पर्यंत पोहचला आहे. तर देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 562 पर्यंत येऊन ठेपला आहे. दरम्यान आता हे संकट अधिक गंभीर होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून आज (25 मार्च) पासून पुढील 21 दिवस लॉकडाऊन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत नागरिकांना घरीच बसण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज दिलासादायक वृत्त म्हणजे पुण्यात आढळलेले पहिलं कोरोनाबाधित दांम्पत्य आज घरी परतणार आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज 14 दिवसांनंतर ते घरी जाणार होते. सोबत राज्यातील 48 रूग्णांची स्थिती स्थिर आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यात नवी मुंबई, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही मात्र दक्ष राहणं गरजेचे असल्याचे सरकरकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भाजीपाला, दूध किंवा औषधं घेण्यासाठी नागरिकांना एकत्र बाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जीवघेण्या कोरोनापासून बचावण्यसाठी विलगीकरण हा एकमेव पर्याय असल्याने घरीच थांबा अशी विनंती देशाचे पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना हात जोडून केली आहे.




