
चंद्रपूर : मधुमेह हा आजार अतिशय मनस्ताप देणारा आहे. माधवबागच्या माध्यमातून मधुमेह निर्मूलनासाठी सुरू असलेले कार्य व संस्थेचे योगदान सर्वोत्कृष्ट आहे असे गौरवोद्गार राज्याचे वन, सांस्कृतिक तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात, मधुमेह विजयोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर बाबासाहेब वासाडे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, सुधीर आकोजवार, मधुमेह निर्मूलनाचे प्रणेते मिलिंद सरदार, डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, डॉ. प्रीती सरबेरे, संजय टेकाळे, डॉ. मिनाक्षी दुबे उपस्थित होते. यावेळी बोलताना ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, अनियमित जीवनशैलीमुळे अनेकांना मधुमेह होतो. अनेक शारीरिक विकारही त्यामुळे निर्माण होतात. हे चक्र बिघडल्यामुळे पशुंमधुनही माणसाला विविध रोगांच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. मानवांचे आजारही पशुंमध्ये संक्रमित होताना दिसत आहेत. कोरोनासारखी महासाथ परिणाम आहे. यासंदर्भात जागतिक स्तरावर आधुनिक संशोधनाची गरज आता भासत आहे, असे ते म्हणाले. कोरोनाच्या महासाथीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेकांना मधुमेहाचा त्रास होता. मधुमेह हा आजार इतर आजारांना निमंत्रण देणारा आहे ; तो थोपवायचा असेल तर माधवबागचा मधुमेह नियंत्रण कार्यक्रम हा सर्वोत्तम आहे. अनियमित आणि तणाव यामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढतो. अशात विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी योगाची कास धरण्याचे आवाहन केले. जगानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे मुनगंटीवार म्हणाले. अर्थमंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती उभारल्या व त्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था उत्तम करण्यावर भर दिला. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केली. सर्वसामान्य गरीब नागरिकांना उपचारासंदर्भात आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, यासाठी आरोग्य क्षेत्रात शक्य तितके योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे , पुढेही तो चालू राहील असेही ना. मुनगंटीवार यावेळी नमूद केले.



