
चंद्रपूर – जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ माजविला असून, आज जिल्ह्यात सुरू झालेल्या विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात मृत्यूचे तांडव केले. जिवती तालुक्यातील पाटण व चिखली येथे अंगावर वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला तर मारई पाटण येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. वंदना चंदू कोटनाके, भारूला अनिल कोरांगे व चंद्रकांत टोपे अशी मृतकाची नावे आहे. शेतीची कामे आटोपून 5 महिला घराकडे निघाल्या होत्या, मात्र अचानक आलेल्या ढगाळ वातावरणाने विजेचा कडकडाट होऊ लागला, त्यावेळी महिलांवर अचानक वीज कोसळली, या घटनेत 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 3 महिला जखमी झाल्या. जखमींना पाटण आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. जिवती तालुक्यातील दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा वीज पडून मुत्यू झाला आहे. चंद्रकांत ठुमके असं मृतकाचे नाव आहे. मारईपाटण येथील शेतकरी चंद्रकांत ठुमके हे शेतात काम करत होते. याचदरम्यान चंद्रकांत यांच्यावर वीज कोसळली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना गडचांदूर येथील आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, जिल्ह्यात एकाच दिवशी तीन जणांनी जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.




